गोर बंजारा तांडा संघटन " जांगड भेळेर रित" #Gor_Banjara_Tanda_system " #Jangad_Bheler"

 गोर बंजारा तांडा संघटन

जांगड भेळेर रित........... ( तांड्यात सामावून घेण्याची पद्धत) 

         गोर बंजारा " धाटी " परंपरेनुसार चालणारा समुह. आपल्या धाटीनियमाचे, वहिवाटाचे पालन करणे यातच " तांडा" आनंद मानतो. तांड्याचं जगणं, वागणं, राहणं हे त्याच्या रुढीला अनुसरूनच असते. जगातील कोणत्याही प्रकारच्या बदलत्या रिवाजाशी त्याला देणंघेणं नाही. आपले विचार, कृती कोणत्याही व्यक्ती वा समुहावर लादण्याचा त्याने कधी प्रयत्नही केला नाही. कोणत्या व्यक्ती, समुहाला आपल्या " धाटी " नियम अनुसरण करण्याचा आग्रह केला नाही. बैलाच्या पाठीवर मालाची ने-आण करणे, हेच काम आनंदाने करत आला. " लदेणी" चे काम करताना वाटेत वाटसरूना मार्गदर्शन करण्याचे कार्य करत आला.  तांड्यासोबत चालणारा वाटसरू राजा आहे की रंक, दोस्त आहे की दुश्मन, गरिब आहे का श्रीमंत याचा कधी विचार केला नाही. सोबत येणारे वाटसरू आपल्या गंतव्य स्थानावर पोहचल्यावर तांडा सोडून निघून जात. सोबत येणाऱ्या विषयी सुख नाही तर जाणाऱ्या बाबत दु:ख न बाळगणारा तांडा. 

        गोर बंजारा गणासोबत भ्रमण करणारा प्रवासी, वाट हरवलेला वाटसरू तांड्यासोबत एकरूप होत असे. तांडाही त्याला भरभरून प्रेम देत असे. " भुकेन बाटी , तरसेन पाणी" देणारी गोर धाटी. त्यामुळे अनेक वेळा वाटसरू तांड्याचाच एक घटक बनत असे. अशा इतर समुहातून‌ आलेल्या व तांड्यात वास्तव करून राहायला लागलेल्या कुटुंब वा व्यक्तीला " जांगड " अशा शब्दप्रयोग वापरला जात असे.   

       इतर व्यक्ती वा समुहाला सामावून घेण्याची पद्धत

       गोर बंजारा गणाव्यतिरीक्त इतर समुहातील व्यक्ती तांड्यात वास्तव करून राहु लागला तर त्याला काही काळानंतर तांड्यात सामावून घेतले जात. याकरिता तांड्याने आपले काही नीतीनियम ठरविलेले असत. " जांगड" व्यक्ती वा परिवार तांड्यांचा घटक बनण्याकरीता गोर बंजारा गणात तीन पिढ्यांपर्यंत वास्तव्य करावे लागे. यामध्ये " पंचमंडळाच्या निर्णयाने " थोडा अधिक फरक होत असे. अशा ज्या व्यक्तीला गोर बंजारा गणात सामावून घ्यायचे असेल तर धार्मिक रिवाजानुसार त्याच्या जिभेवर सोन्याच्या तारेला तापवून डाग दिल्या जात असे.

         ‘दोनजिभा’ असलेल्या ज्या शत्रूचा उल्‍लेख आर्य करतात ते नागवंशीय होते किंवा काय? कारण, बंजारेत्तरांना गोरबंजारा गणात सामावून घेताना किंवा धार्मिक कल्पनाचे उल्‍लंघन केल्यामुळे बहिष्कृत ठरलेल्यांना परत जातीत सामावून घेतानाच्या इतर विधीबरोबर अशा व्यक्‍तींच्या जिभेला तापविलेल्या सोन्याच्या तारेने चिरा देण्याची प्रथा गोर बंजारा गणात पूर्वापार रूढ आहे, तेव्हा दोन जिभा असलेले आर्यांचे शत्रू गोर बंजारा गण सुद्धा नसू शकेलच असे म्हणता येणार नाही. 

#गोर_बंजारा_संस्कृती @बंजारा #गोरमाटी #GorBanjaraSanskruti

         जांगड भेळेर नक्ता ( सामावून घेण्याची पद्धत)

     इतर जातींतील व्यक्तीला तीन पिढ्या नंतर गोरबंजारा गणात  समावेश केला जात असे. गोर गणात घेताना " भेळेरो विधी" करतात. सोने तापवून जिभेला चटका देतात. बोकुड कापतात. नायकाच्या थाळीतील हाड त्याला देतात म्हणजेच पंगतीत बसण्याच्या योग्य मानल्या जाते .

जांगड भेळेर प्रथा बाबत विविध मतप्रवाह 

           जांगड व्यक्ती बाबत आर.व्ही रसेल,  राय बहादूर हिरालाल, चाईल्डर्स अशा अनेक अभ्यासकांनी सांगोपांगी वढाळ विधाने ठोकून सत्याला कलाटणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. चाईल्डर्सचा हवाला देऊन डाॅ.जे.जे.राय बर्मन यांनी " एथनाग्राॅफी ऑफ ए डी.नोटी- फाईड ट्राईब द लमाण बनजारा" ग्रंथात पूरविलेली माहिती अशी की,

             When any child was stolen & brought in to the Tanda They were made it work as labourers But at time of their marriage an initiation ceremony was performed and is still done the boy’s tongue is pierced with a golden thread this is called “Bheler’

     मूळात ही पुरविलेली माहिती चुकीची असून निराधार आहे.कारण कोर आणि गोर या सर्वावर सारखी कृपादृष्टी असू दे! अशी परमेश्वराकडे नित्या करुणा भाकणारा कोणताही गोरमाटी हा मुलं चोरुन आणून त्याला मजूरा प्रमाणे काम करण्यास भाग पाडून , लहान मुलांचे शोषण करण्याइतका क्रूर असूच शकत नाही.

                गोरगणातील " जांगड भेळेरो" या प्रथेचा चुकीचा अर्थ लावून कंबरेज,रसेल,हिरालाल आणि चाईल्डर्स ई.अभ्यासकांनी गोर बनजारा गणांना हेतुपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

                पाश्चिमात्य इतिहासकारांचा संदर्भ घेऊन लिहिणार्या अभ्यासकांनी या पुढे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, *जांगड या शब्दाचा अर्थ परत बोलीचा माल,पसंत पडले तर ठेवायचा नाही तर परत करावयाचा अशा कराराने आणलेला माल,जोडणी,संबध असा होतो* यास वासुदेव गोविंद आपटे यांच्या ‘मराठी शब्द रत्नाकर’ या शब्दकोशाचा आधार आहे.

                प्राचीन काळी दळणवळणाची साधने ही प्रामुख्याने गोर बनजारांच्या तांड्यांच्या अधीन असल्यामुळे अन्नधान्याचा भरपूर साठा गोरगणाकडे बारोमास असायचा. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे म्हणा, युद्धात अनाथ झालेली लोकं  किंवा गरीब – श्रीमंत या विषमतावादी समाज रचनेमुळे म्हणा उपासमारीने वाताहत झालेली कुटुंबे अन्नधान्यासाठी आपल्या पोटच्या मुलामुलींना परत घेऊन जाण्याच्या बोलीवर गोर बनजाऱ्यांच्या कुटुंबाच्या हवाली करीत म्हणजे गहाण ठेवीत असत.

                  गोर बनजारांचा तांडा सतत लदेणी व्यवसायात गुंतलेला असल्यामुळे परत यांची भेट होत नसे अशा परिस्थितीत गहाण असलेली मुलं परत करणे गोरमाटींना शक्य नसायचे. पुढे वयात आल्यावर अशा मुलामुलींना विधिवत त्यांच्या जिभेला तप्त सोन्याने थोडासा चीर देऊन आपल्या जमातीत समावून घेत आणि आपल्या मालकांचे कुळगोत्र अशा मुलामुलींना देऊन त्यांची लग्ने लाऊन त्यांचे संसार थाटून देत असत.मग मुलं चोरुन आणण्याचा प्रश्न उरतोच कुठे ?

             या ठिकाणी इतिहासाचे गाढे अभ्यासक प्र.रा.देशमुख यांनी पुरविलेली माहिती या संदर्भात लक्षणीय ठरते “ दुर्योन नावाचे तटबंधीचे शहर पुरुकुत्साने शुष्णाजवळून जिंकून घेतले.शुष्ण धान्नाचा फार मोठा व्यापारी होता. त्याचे धान्य लुटण्यासाठी पुरुकुत्साने स्वारी केली. त्याचे शृंगिण म्हणजे शिंगे धारण करणारा व कुयवाचः कापलेली जीभ असलेला असे वर्णन आहे. हे वर्णन ज्यांनी आपली पाच हजार वर्षाची परंपरा कायम राखली त्या बंजारालाही लागू पडते. बंजाऱ्याच्या डोक्यावर दिसणार्या शिंगाचा आर्यपूर्व लोकांच्या शिंगाशी संबंध दाखविण्यासाठी त्या दोन समाजाचा संबंध दाखवीणे जरुर असल्यामुळे बंजारी समाजाचे वेदातील आर्यांच्या शत्रूची जरा तपशीलवार तुलना करावी लागली त्यामुळे सामाजिक जीवनाच्या निकृष्ठावस्थेत असलेल्या अज्ञान व दारिद्र्यात खितपत पडलेल्या या समाजाचा भूतकाळ केवढा मोठा होता याची काहीशी कल्पना येइल”.

      वैभवशाली अशा जगजेष्ठ संस्कृतीचा वारसा लाभलेला गोर बनजारा गणसमाज हा मुलं चोरुन आणू शकेल काय ?

             प्राचीन काळी लढ्यामुळे वाताहत झालेल्या टोळ्यतील सापडलेली मुलं किंवा अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या अशा परक्या जातीतील सापडलेल्या मुलांना आणि परत बोलीच्या करारावर गहाण असलेल्या मुलामुलींना विधिवत त्यांच्या जिभेला तप्त सोन्याने थोडासा चीर देऊन गोर बनजारा गणात समावून घेण्याच्या प्रथेला “जांगड भेळेरो”म्हणत.

       या प्रथे विषयी रसेलचे म्हणणे असे की,  “The tongue’s of boy’s were some time’s slit or branded with hot gold This last being the ceremony of initiation in the caste still used in Nimar”

या वरुन निर्विवाद सिध्द होते की,नागवंशीय गोर बनजारा गण समाज हा मूळनिवासी,नेटिव्ह सन्स Indigenous होय. यांचे मूळत्व नाकारण्यासाठी इथल्या समाज व्यवस्थेने या समाजाला चोरगुन्हेगार ठरवून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कट कारस्थान रचले. हे निर्विवाद सत्य आहे.

गोर बंजारा संस्कृती

किशोर आत्माराम नायक 

संदर्भ-

१, एथनाग्राॅफी ऑफ ए डी.नोटी- फाईड ट्राईब द लमाण बनजारा

डाॅ.जे.जे.राय बर्मन

२, सिंधू संस्कृती ऋग्वेद व हिंदू संस्कृती.....प्र.रा.देशमुख

३, मराठी शब्द रत्नाकर......वासुदेव गोविंद आपटे

४, गोर बंजारा इतिहास व लोकजीवन.. आत्माराम कनिराम राठोड 

५,गोरमाटी संस्कृती आणि संकेत.......भीमणीपुत्र

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess